सोलापूर : कोरडवाहू जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. सध्या उष्णतेची लाट आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकरी आपली पिके वाचवण्यासाठी विविध उपाययोजना करून धडपडत आहेत.
सोलापूर जिल्ह्यात सध्या सरासरी ४३ अंश सेल्सिअसच्या वर तापमान आहे. या वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी जास्त खर्च करावा लागत आहे. पिकांना दिलेल्या पाण्याचे कडक उन्हामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. हे बाष्पीभवन रोखण्यासाठी बहुतांश शेतकरी आपल्या बागांमध्ये जैविक, तसेच प्लास्टिक आच्छादन करू लागले आहेत. केवड (ता. माढा) येथील शेतकरी महारुद्र लटके यांच्याशी संपर्क साधला असता, कडक उन्हापासून फळबागा वाचवण्यासाठी जैविक आच्छादनावर भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील काही शेतकरी कडक उन्हापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी फळे पाॅलीप्राॅपिलीनने झाकून घेत आहेत. काही भागात बागेतील झाडांच्या खोडांना गेरू पेस्ट लावली जात आहे. शेतकरी पिकांना रात्रीच्या वेळीच पाणी देण्याचे नियोजन करत आहेत.
फळकाढणी झालेल्या बागांमध्ये हलकी छाटणी केली जात आहे. काही शेतकऱ्यांनी शेतात स्लरीचा वापर वाढवला आहे. एकूणच हातातोंडाशी आलली पिके उष्णतेमुळे वाया जाऊ नयेत, म्हणून शेतकरी धडपड करताना दिसत आहेत.